प्रतिनिधी वजीर शेख,
आजच्या या स्पर्धात्मक व आव्हानात्मक युगात विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर, आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व स्वसंरक्षण क्षम असायला हवे असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर शेषराव पवार यांनी केले. विद्यार्थी कल्याण मंडळ सावित्रीबाई फुले ,पुणे विद्यापीठ ,पुणे व श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान शिबिर श्री आनंद महाविद्यालय मध्ये पार पडले. या शिबिराचे अध्यक्ष डॉक्टर शेषराव पवार यांनी शिबिराची उपयुक्तता विद्यार्थिनींना सांगितली. ते म्हणाले की महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मिळेल त्या प्रत्येक गोष्टींतून विद्यार्थ्यांनी काहीतरी ज्ञान संपादन केले पाहिजे. हीच शिदोरी आयुष्यभराची पुंजी बनून राहते. आजची स्त्री ही आत्मनिर्भर होत आहे. त्या अनुषंगाने आपल्या महाविद्यालयात नेहमीच विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात निश्चित होतो.
निर्भय कन्या अभियान शिबिराचे पहिले पुष्प श्री अंबादास साठे कराटे प्रशिक्षण व त्यांचा विद्यार्थी सागर सानप पाथर्डी यांनी गुंफले व विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण दिले. त्यांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी कराटेचे स्वसंरक्षणासाठी प्रात्यक्षिक दाखविले व सहभागी विद्यार्थिनींकडून करून घेतले. जर एखादी व्यक्ती मागून किंवा पुढून अकस्मात हल्ला करत असेल तर त्यापासून कसा बचाव करायचा इत्यादी साध्या साध्या गोष्टीतून त्यांनी स्वसंरक्षणाचे धडे दिले. तसेच कराटे मुळे शरीराची लवचिकता ,मनाची एकाग्रता व आत्मविश्वास कसा वाढतो याविषयी प्रदीर्घ मार्गदर्शन केले .कराटे प्रशिक्षणाचा उपयोग दहावी बारावी परीक्षेत वाढीव गुण ,सरकारी नोकरी इत्यादी मध्ये पण होऊ शकतो हे त्यांनी सांगितले.
शिबिराचे दुसरे पुष्प बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील प्राध्यापिका सुरेखा चेमटे यांनी महिला सबलीकरण या विषयावर गुंफले. आपल्या व्याख्यानात त्यांनी वैदिक काळातील ,इतिहासातील स्त्रिया जिजाऊ माता, झाशीची राणी ,रजिया सुलतान ,इंदिरा गांधी इत्यादी महत्त्वकांक्षी व ऐतिहासिक कामगिरी घडवणाऱ्या स्त्रियांच्या क्षमता ,निर्णय घेण्याची क्षमता, बौद्धिक क्षमता इत्यादी विषयी सांगून विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले. आयुष्य किती मोठे आहे, यापेक्षा कमी दिवसांत आपण मोलाचे काम करू शकतो याचे स्वामी विवेकानंद ,संत ज्ञानेश्वर इत्यादींचे उदाहरणे देऊन त्यांनी कसे अजरामर व उल्लेखनीय कार्य केले याचे स्मरण करून दिले. आपल्या ओघवत्या शैलीत मॅडमने विद्यार्थिनींना आत्मसाक्षरता, आर्थिक साक्षरता, महिला सबलीकरण व त्याची गरज यावर सखोल मार्गदर्शन केले.
या शिबिरातील तिसरे पुष्प प्राध्यापिका अश्विनी थोरात, श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी, यांनी महिला व्यक्तिमत्व विकास या विषयावर गुंफले. मॅडमने व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, त्याची काय गरज आहे, ते आपल्याला प्रभावीपणाने कसे विकसित करता येते यावर उदाहरणासह मार्गदर्शन केले. एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य त्याच्या हातात जरी नसले तरी त्याला त्याचे व्यक्तिमत्व प्रभावी पणे कसे खुलवता येते याचे नेमके उदाहरण देऊन त्यांनी विद्यार्थिनींना आश्वासित केले .पी टी उषा, सायना नेहवाल ,मेरी कोम इत्यादी महिला खेळाडूंपासून ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रियांचे दाखले दिले. एखाद्या महिलेचे व्यक्तिमत्व तिच्या शिक्षणाने ,राहणीमानाने, समाजात वावरताना सहज लक्ष वेधून घेते. आपण जेथे जाऊ तेथे आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा ठसा आपल्याला उमठवता आला पाहिजे हे त्यांनी आवर्जून सांगितले.
या शिबिराचे प्रास्ताविक डॉक्टर जगन्नाथ बरशिले यांनी केले. या शिबिराचे सूत्रसंचालन प्राध्यापिका मनीषा सानप यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका अनिता पावसे यांनी केले . या शिबिरास डॉक्टर जयश्री खेडकर ,प्राध्यापिका रूपाली शिंदे, डॉक्टर बथुवेल पगारे, डॉक्टर अनिल गंभीरे उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.










